दिवस जेव्हा
निशेच्या कुशीत शिरू पाहतो ना
तेव्हा ती लाजून लालेलाल होते
त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून
दिनकरही दूर निघून जातो
चेह-यासमोर हात धरल्याचं सोंग करत
निशीकांत लपून पाहत राहतो
आणि मिष्कील चांदण्या
डोळे मिचकावत राहतात
अंधाराच्या अावेगात
काय काय होतं नि काय नाही,
पण निशा जेव्हा भानावर येते तेव्हा
अनुभवलेल्या विश्वरूपाच्या आठवणींनी
ती पुन्हा लाजत लालेलाल होते
जणू काही झालंच नाही
कोणाला काही कळलंच नाही
अशा विभ्रमांत
सूर्याला बोलावू लागते

